Saturday, December 6, 2025
spot_img
spot_img
spot_img

विश्वविजेत्या टीमचा राज्य सरकारकडून सत्कार; | …..कोटींचं दिलं बक्षीस!

आयसीसी महिला विश्वचषक 2025 मध्ये प्रथमच भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांचा सत्कार केला. भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट टीमचा विजय क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, राधा यादव यांना प्रत्येकी 2 कोटी 25 लाख, तर प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांना 22 लाख 50 हजार आणि सर्व सहकारी यांना प्रत्येकी 11 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

गोलंदाजी प्रशिक्षक आविष्कार साळवी, पद्मश्री डायना एडल्जी, ॲनालिस्ट अनिरुद्ध देशपांडे, लॉजिस्टिक सपोर्ट अपर्णा गंभीरराव, ऑपरेशन मॅनेजर मारुफ फजानदार, मिहिर उपाध्याय, पूर्वा काटे, ममता शिरसुल्ला यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
सत्कारावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विश्वचषकात भारतीय महिला टीमने पहिल्यांदाच विजेतेपद पटकावून इतिहास रचला आहे. याचा संपूर्ण भारतीयांना अभिमान आहे. या विजयाने भारताचा गौरव वाढवला आहे. सुरुवातीच्या काही पराभवानंतर संघाने केलेली पुनरागमनाची कामगिरी उल्लेखनीय आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले , महिला क्रिकेटच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक क्षण आहे. पद्मश्री डायना एडल्जी यांनी लावलेले रोपटे आज मोठे झाले आहे. ग्रामीण भागातील मुलींना संधी मिळाली तर त्या जागतिक स्तरावर यश प्राप्त करू शकतात हे या क्रिकेट संघातील खेळाडूंनी सिद्ध केले आहे. या विजयाने क्रीडा रसिकांच्या अपेक्षा वाढल्या असून, भविष्यातही आपण असेच यश प्राप्त कराल अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केली.
स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, राधा यादव, प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी आभार मानत, सर्व संघाचे आणि क्रिकेट प्रेमींचे आभार मानले. बीसीसीआयच्या अखंड पाठिंब्यामुळे आणि खेळासाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे हे शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
RELATED ARTICLES

Most Popular